Sunday 19 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ६

"कोरोना" पश्चात परिस्थिती सेवा क्षेत्रातील संधी व आव्हाने

शेती क्षेत्रातील संधींबाबतच्या कालच्या लेखाच्या अनुषंगाने अनेकांनी आपली मते मांडतांना ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व खेड्याकडे चला हे अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात यायला सुरवात होईल असे मत व्यक्त केले.  अर्थात त्यासाठी शासनाकडून ग्रामीण भागातील उद्योग उभारणीसाठी विशेष सहकार्य व प्रोत्साहन दिले गेलं पाहिजे असेही बोलून दाखविले. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मधील एकाने तर आपण या क्षेत्राकडे वळण्याचा गांभीर्याने विचार करतोय असेही बोलून दाखविले आपल्या गावाकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरु करण्याचे सांगितले. आजच्या भागात आपण सेवा क्षेत्रातील काही प्रमुख गोष्टींचा विचार करणार आहोत.


"कोरोनाचा" सर्वाधिक फटका आर्थिक क्षेत्राला आणि त्यातही सेवा क्षेत्राला बसणार आहे. सेवा क्षेत्रातही अधिकाधिक संधी असलेले क्षेत्र म्हणजे शेती आणि म्हणुनच आपण त्याबद्दल सुरवातीला बोललो. शेती सोबतच विमा, हेल्थ केअर, औषध निर्माण व ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात अधिक संधी दिसतील. मात्र ऑटोमोबाईल, रेल्वे, विमान वाहतूक, ट्रॅव्हल्स व पर्यटन आदी क्षेत्रांवर फार मोठा परिणाम जाणवेल. तो किती काळ असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. बँकिंग क्षेत्राला यातून बाहेर निघणे कठीण आहे मात्र अशक्य नाही. रोजगाराच्या दृष्टीने सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसेल. अनेक सर्वेक्षणातून व शिखर संस्थांच्या प्रमुखांनी भयाची स्थिती व्यक्त केली आहे. ऑटो , टेक्सटाईल, चैनीच्या वस्तू उत्पादकांना मोठे आव्हान असेल. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मानव संसाधन कमी होईल. या क्षेत्रातील धुरिणांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली असून वेगवेगळ्या प्रकारे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढीसाठी किमान दोन वर्षे वाट पाहावी लागेल असे आजच्या स्थितीवरून वाटते आहे. यावर्षी बोनस व सानुग्रह अनुदान केवळ अशक्य आहे.


बँकिंग क्षेत्रात एनपीएत वाढ होण्याचा धोका व्यक्त केला जात असतांना त्याचा बँकांच्या नफाक्षमतेवर मोठा परिणाम होईल. रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यातील कर्जाच्या परतफेडीला स्थगिती दिल्याने त्याचा हि परिणाम बँकांच्या उत्पन्नावर होईल. छोट्या व माध्यम उद्योगांना वेळेवर पतपुरवठा उपलब्ध करून दिल्यास त्याचा काही प्रमाणात बँकांना लाभ होऊ शकेल अर्थात त्यासाठी किमान वर्षभर वाट पाहावी लागेल. "जोखीम" हा बँकिंग क्षेत्राचा परवलीचा शब्द कोरोना पश्चात कळीचा शब्द ठरेल. त्याच्या कसोटीला उतरणाऱ्यांनाच भविष्य आहे.



विमा क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल. त्यासाठी शासनाने लाईफ प्रोटेक्टेड विमा प्रकारांना कर सवलतींद्वारे आकर्षित करता येईल. आगामी काळात विमा क्षेत्राकडे गुंतवणूक म्हणून न पाहता संरक्षण दृष्टिकोनातून पहिले जाईल. साथीच्या रोगाच्या अनिश्चिततेमुळे विमा क्षेत्राला मागणी वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाची अधिक चांगल्या संधी उपलब्ध राहतील मात्र त्यासाठी अपेक्षित पूर्व तयारी व अभ्यास महत्वाचा ठरेल. दीर्घकाळासाठी या क्षेत्राला फायदा झालेला दिसेल.

कापड उद्योगात १ रोजगार कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिखर संस्थेने आपल्या सभासदांचा सर्व्हे घेतला ज्यात २० टक्के कंपन्या लॉक डाऊन नंतर आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे नमूद केले आहे. ६० टक्के कंपन्यांनी आपल्या उत्पन्नात ४० टक्क्याची कमी होईल असे म्हटले आहे. सरकारने वेतन सबसिडी, कर भरण्यासाठी सवलत या सारख्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रावरही लॉक डाऊनचा मोठा नकारात्मक परिणाम होईल.

सेवा क्षेत्रात ग्राहक सर्वात महत्वाचा घटक असतो. त्याची क्रयशक्ती वाढेल अशी बाजारातील स्थिती नाही. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांकडे ग्राहक वळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या गरजा मर्यादित करुन धनसंचय करण्याकडेही त्याचा कल असेल. अर्थात या सर्व गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी किमान ४ महिने "वेट अँड वॉच" करावे लागेल. 

No comments:

Post a Comment