Wednesday 15 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग २

व्यक्तिगत व संस्थात्मक जीवनातील आत्मपरीक्षण 


"कोरोना"च्या या महाभयंकर संकटातून देश बाहेर निघेल अशी आता सर्वांना खात्री आहे. केवळ त्यातून बाहेर निघू असे नाही तर सर्व पूर्ववत होईल अशी पण अपेक्षा दिसते. कालच्या पहिल्या भागावर आलेल्या मर्यादित प्रतिक्रियांवरुन असे म्हणता येईल. शेवटी जे सर्वांचे होईल ते आपले होईल अशा मनोभूमिकेतून असे होण्याची शक्यता आहे. मला वैयक्तिक तसे वाटत नाहीआणि त्यासाठीच हा लेख प्रपंच आहे.

याविषयावर जगभरातील मंडळी काय म्हणतात, ते याचा कसा विचार करतात याचा आढावा घेता आपण अधिक जागरूक होण्याची गरज आहे असे वाटते. ज्यांना या संकटाची झळ पहिल्या टप्प्यात पोहोचली त्यांनी त्यावर विचार करणे नक्कीच सुरु केले असेल. मी व माझे सहकारी त्यातीलच आहोत. त्यामुळेच आम्हाला संभाव्य धोक्यांची जाणीव झाली आहे. आपल्यासोबत सर्वानीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे असे वाटते. अर्थात हे लिहीत असतांना मी फार हुशार आहे आणि मला या मांडलेल्या विषयातलं खूप काही समजतं असा माझा दावा नाही. यासाठीच आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा ठेवून आहे. या विषयातील तज्ज्ञांनी नक्कीच मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे.

काल विविध व्यवसायांच्या अनुषंगाने माही मुद्दे मांडले होते. आज व्यक्तिगत पातळीवर काही गोष्टींचा विचार मांडणार आहे.

१) कोरोना पश्चात माझे अस्तित्व काय ? मी जेथे नोकरी करतो, ती असेल का ? असली तर आजचे कामाचे स्वरुप तसेच असेल का ? नसेल तर नव्या स्वरुपात मी टिकाव धरु शकेल का ? त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केली आहे का ?

जर आजची नोकरी नसेल तर माझ्या समोर अन्य कोणते पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांपैकी मला सोयीचा कोणता ? नोकरीच करायची नसेल तर उत्पन्नाचे अन्य मार्ग कोणते ? माझ्या अनुभवाचा फायदा घेऊन मी स्वयंरोजगाराकडे वळू शकतो का ? त्यासाठी लागणारे भांडवल आदी आहे का ? नसले तर ते कसे उभारणार ?

थॊडक्यत आपण आपल्या बलस्थानांचा व मर्यादांचा विचार करुन आपल्या स्वतःच्या कार्यपद्धतीचा विचार करणे क्रमप्राप्त होणार आहे. समाजाच्या मूलभूत गरजांशी संबंधित असलेल्या व्यवसायांवर फारसा फरक पडणार नाही मात्र अन्य सर्वच क्षेत्रात नव्याने विचार करावा लागेलच. आपल्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतांचा विचार करीत असतांनाच त्यांच्या मर्यादांचा विचार करावा लागेल. त्यामध्ये अपेक्षित क्षमता विकासालाही विचार करावा लागेल.

आपल्या वार्षिक उत्पन्नावर काही परिणाम झाल्यास त्यातून मार्ग काढण्याची व्यवस्था काय ? कुटुंबाचे उत्पन्न वाढीसाठीचे अन्य मार्ग कोणते ? कारण आजच्या उत्पन्नावर निर्माण केलेला खर्च (गृह कर्ज, वाहन कर्ज, लाईफ स्टाईल इ.) कसा भागविणारं ? कोणता खर्च कमी करता येईल, कोणत्या खर्चावर नियंत्रण आणता येईल ?



२) मी छोटा-मोठा व्यवसाय करीत असेल तर त्यालाही असाच पद्धतीने विचार करावा लागेल. येथे त्याला स्वतःसह त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचाही विचार करावा लागेल. कालच्या लेखात याबद्दल आपण अधिक विस्ताराने लिहिले आहे. माझ्या व्यवसायातील मनुष्यबळ सोबत असणार आहे का ? कारण ते जर अन्य प्रांतातून असतील अगदी अन्य जिल्ह्यातून असले तरी त्यांचा ओढा आता आपल्या मूळ गावाकडे होऊ शकतो. अशा वेळी आपल्याला नव्याने लागणारे मनुष्यबळ आपल्या परिसरातून निर्माण करता येईल का ? व्यवसायासाठी लागणारे कौशल्ये त्यांच्याकडे आहे का ? त्यांना तयार करण्यासाठी पुरेसा वेळ व गुंतवणूक करण्याची माझी क्षमता आहे का याचाही विचार करावा लागेल.

येथेही आपल्या व्यवसायाची गती व वृद्धी आजच्या सारखी राहील का ? त्यासाठी काय करावे लागेल ? काही व्यवसाय पूरक व्यवसायांचा विचार करता येईल का ? ज्यामुळे लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली गॅप (फरक) कमी करता येईल. उत्पन्नवाढीसोबतच कॉस्ट कटिंगचे मार्ग कोणते ?

३) लॉक डाऊनच्या काळातील विस्कटलेली आर्थिक घडी पुनर्स्थापित करण्यासाठी लागणारा कालावधी किती ? त्यासाठीची आर्थिक तरतूद आहे का ? नसल्यास त्याची उभारणी कशी ? उत्पन्न मिळाले नाही तरी आवश्यक व मूलभूत खर्च करावा लागणार त्यामुळे निर्माण होणाऱ्या कसरतीचा सामना कसा करणार त्याचा कृती कार्यक्रम तयार आहे का ?

४) व्यवसायाची नव्याने पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठीचे आवश्यक नियोजन केलं आहे केले आहे का ? त्यासाठीचे कुशल व अकुशल मनुष्यबळ, मशिनरी, मार्केटिंग व आर्थिक उभारणी याचा विचार केला आहे का ?

५) लॉक डाऊन नंतरच्या काळातील आव्हानांना सामोरे जात असतांना आपल्यासह सहकाऱ्यांचे मनोधैर्य राहावे यासाठीची योजना काय ? कारण व्यावसायिक व कौटुंबिक पातळीवर कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा मनावर होणारा परिणाम मोठ्या प्रमाणात ताण निर्माण करणार. त्यावर मात करण्यासाठी स्वतःची सकारात्मक वृत्ती व इतरांसाठीची योजना याचाही विचार करावा लागेल.

६) सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्व लक्षात घेता आपण कुठे आहोत ? जर तीच काळाची गरज असेल आणि त्याला पर्याय नसेल तर आपण ते कसे आत्मसात करणार आहोत ? लॉक डाउनच कालावधी अशा प्रकारच्या तयारीसाठी वापरता येईल का ?

एक उदाहरण आज आपण पाहू..

सध्या चर्चेत असलेले मोठमोठ्या मीडिया हाऊसेस मधील स्थिती... व्यवसाय म्हणून विचार केला तर जाहिरातीच्या माध्यमातून, वर्तमानपत्र विक्रीतून अपेक्षित उत्पन्न निर्माण न झाल्याने कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन देण्यात आले. परिस्थिती बदलली नाही तर पुढे जाऊन २५ टक्के वेतनात काम करावे लागणार. पगारातून होणारी कपात वजा जाता उदरनिर्वाहासाठी ३५ टक्के रक्कम हातात मिळाली पाहिजे. जर पगारच २५ टक्के मिळाला तर ६५% खर्चाचे काय ? आपण या गोष्टीचा विचार करतांना केवळ नोकर असा भावनिक विचार करुन चालणार नाही. व्यवसायांचे मालक म्हणून व्यावहारिक विचार करावाच लागेल. येथे रोजगाराचाच प्रश्न निर्माण झाला. हा जसा एका क्षेत्राबद्दल आहे तसे ज्या ज्या व्यवसायांवर परिणाम झाला तेथे तेथे या समस्या असणार.

मित्रहो, वैयक्तिक मनुष्यपातळीवरची ही यादीही खूप मोठी होईल. ती त्या त्या व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून असेल. प्रश्नांची यादी मोठी असली याचा अर्थ समस्या गंभीर आहे, आव्हान मोठे आहे. या सर्व प्रश्नांचा आपण नकारात्मक विचार न करता वास्तव स्वीकारून आवश्यक ते बदल करणे क्रमप्राप्त आहे व त्यातच भविष्यातील यासाची बीजे आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टीत कुटुंब सदस्यांसह व्यवसायातील सहकाऱ्यांना विश्वासाने सहभागी करुन घेतले पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तसेच आत्मपरीक्षण करण्यासाठी संधी या लॉक डाऊनमुळे मिळाली आहे. या उपलब्ध वेळेचा हुशारीने वापर करीत काळाची पावले ओळखत सिद्ध व्हावे लागेल. भारत समर्थ होण्यासाठी समाज समर्थ होण्याची गरज आहे. समाज समर्थ होण्यासाठी त्यातील घटक अर्थात माणूस समर्थ झाला पाहिजे. पुढच्या भागात उपलब्ध संधींचा आपण विचार करु. (क्रमश:)

कृपया मी मांडलेले विचार वाचून त्यातून सुटलेले महत्वाचे विषय लक्षात आणून द्या. या विषयाचा सर्वार्थाने व साकल्याने विचारच पुढील वाटचाल समृद्ध करेल.

2 comments:

  1. विचार चांगले आहेत . खालील मुद्दे अंतर्भूत करून त्यावर साधक बाधक चर्चा / विचार मंथन करावे
    १ ) प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तीमत्व असते, तसेच प्रत्येकाची शक्तीस्थळे व मर्यादा वेगवेगळ्या असतात .
    त्यांचा समन्वय साधला पाहिजे .
    २ ) वरील मुद्दे संस्थानाही लागू आहेत .
    ३ ) पैशांचे सोंग आणता येत नाही , म्हणून एका कमीत कमी उत्पनाची व्यवहार्य योजना हवी .
    ४ ) योजना लवचिक हवी .
    ५ ) नेतृत्वगुण अंगी असणाऱ्या लोकांना संधी द्यावी .
    ६ ) कुठल्याही परिस्थितीत संधी असते , ती शोधावी व संधी चा उपयोग करावा .

    ReplyDelete
  2. धन्यवाद ! यापुढील माझ्या लिखाणातून आपण सुचविलेले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. तसे तर आपणच त्यावर विस्ताराने अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकतात. कारण त्यासाठीची विचार प्रक्रिया आपल्या मनात सुरु असते. त्यामागील उद्देश वा हेतू तुम्हाला अधिक माहिती असतो. पहा जमवून..

    ReplyDelete